
NANDED TODAY:18,August,2021 बँकांनी त्वरित शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे – आ. बालाजी कल्याणकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गाजला मुद्दा नांदेड-खरीप हंगामाची पीके अतिवृष्टीमुळे भुईसपाट झाले, त्यात उरलेसुरले पीक पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे गेले आहेत.
यामुळे पुरता शेतकरी हवालदिन झाला आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी बँकांनी त्वरित पीक कर्ज देणे गरजेचे, असल्याचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनीदेखील तात्काळ बँकांनी पीक कर्ज वाटप केले पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर रितसर कारवाई केल्या जाईल असा इशारा दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारने सरसगट दोन लाखाची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांनी दुबार कर्जासाठी बँकांकडे मागणी केली आहे. बँका मात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे आल्या आहेत.
शेतकरी मात्र बँकात चकरा मारून बेजार आहेत. बँकेतील अधिकाऱ्यांना शेतकर्यांनी कर्जाबाबत विचारपूस केली असता, बँकेतील अधिकारी व कर्मचारी हे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच येथील बँकेत पर राज्यातील अधिकारी असल्यामुळे त्यांना एक तर मराठी भाषा समजत नाही त्यामुळे अनेक वाद उदभवत आहेत.
नांदेड उत्तर मतदारसंघातील गावांच्या दत्तक बँक बदल्या गेल्या आहेत. ज्या बँका नव्याने दत्तक म्हणून दिल्या आहेत. त्यांना अद्याप क्षेत्रीय कार्यालयाकडून याद्या प्राप्त झाल्या नसल्यामुळे, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

याबाबत नांदेड उत्तर चे आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी क्षेत्रीय कार्यालयाचे व्यवस्थापक यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
जे अधिकारी शेतकऱ्यांसोबत अरेरावीची भाषा करत आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन करून, तात्काळ शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा अशा सूचना केल्या आहेत.
तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी देखील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापकांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत तसेच आज पर्यंत किती प्रमाणात पीक कर्ज वाटप केल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्याचे देखील सांगितले आहे